इतिहास म्हणजे भूतकाळ हे सर्वज्ञात आहे.हा भूतकाळ मानव जातीचा आहे.तो हजारो,लाखो वर्षाचा आहे.मानवाच्या लाखो वर्षाच्या या वाटचालीतील चाकाचा शोध, अग्निचा शोध आणि शेतीचा शोध क्रांतीकारक ठरला आहे. मानवाने या लाखो वर्षाच्या वाटचालीतील आपल्या प्रगतिच्या आणि विनाशाच्या पाऊलखुणा मागे ठेवल्या आहेत.या पाऊलखुणा म्हणजे त्याच्या दैनंदिन वापरातील वस्तू, मातीची भांडी, मनोरंजनाची साधने, हत्यारे, मानवी हाडे, गुहा,गुंफा, लेण्या,विहार, शहरे, भग्नावशेष, मंदिरे, मशिदी, किल्ले, लिखीत साधने, मौखिक साधने, लोकगीत, दंतकथा प्रशासकीय कागदपत्रे, आत्मचरित्रे होय.या पाऊलखुणा म्हणजेच इतिहास संशोधनाची साधने असतात.इतिहास संशोधक या साधनांच्या आधारेच मानवाचा हजारो ,लाखो वर्षाचा भूतकाळ आपल्या समोर मांडत असतो. कार्बन सी या कालमापन पध्दतीनुसार मानवी हाडातील कॅल्शियमच्या प्रमाणावरुन किती वर्षापूर्वी ही मानव जात होऊन गेली, तो मानव कोणत्या वंशातील होता हे सांगता येते.
साहित्याच्या क्षेत्रात प्रतिभेला,सृजनशीलतेला जसे एक वैशिष्टपूर्ण स्थान असते तसे इतिहास संशोधनात वस्तुनिष्ठेतेला स्थान असते. इतिहास संशोधन करणारी व्यक्ती ही एक माणूसच असते आणि माणूस म्हटले की,मानवी भावभावना,मन आणि व्यक्तिनिष्ठा हे ओघाने येतेच.अशा व्यक्तिच्या मनात धर्म,जात आपल्या धर्म जातीची व्यक्ती याबाबत मनाच्या तळाच्या कोपऱ्यात आपुलकी असतेच आणि त्याचबरोबर व्देष वा मत्सर असतो. तसेच एका विशिष्ट विचारसरणीचा प्रभाव असू शकतो. इतिहास संशोधकाची खरी कसरत येथेच असते. त्याला आपल्या मनातील व्यक्तिनिष्ठा, धर्मनिष्ठा, प्रांतनिष्ठा आणि पूर्वग्रह हे सर्व बाजूला ठेऊन ऐतिहासिक घटनेकडे त्रयस्तपणे पाहावे लागते. त्या घटनेचे मूल्यामापन करावे लागते. संशोधनातून जी माहिती समोर येते ती निर्भीडपणे मांडावी लागते. इतिहास संशोधक या प्रक्रियेतून जात असताना सत्याचा शोध घेणे हा इतिहास संशोधनाचा मुख्य हेतू आहे याचा कुठेही विसर पडू देत नाही.अर्थात बाजारपेठेत जसे १०० नंबरी सोने मिळत नाही त्याप्रमाणे इतिहासत १०० टक्के वस्तुनिष्ठता येऊ शकत नाही हे इतिहास संशोधक जाणतो. तरी त्याचा प्रयत्न हाच असतो की, इतिहास लेखनात अधिकाधिक वस्तुनिष्ठता आली पाहिजे. अर्थात याकामी त्या-त्या काळातील सत्तेत असलेल्या सरकारची भूमिका महत्वाची असते. कोणत्याही काळातील सरकारने इतिहास संशोधन व लेखन यामध्ये हस्तक्षेप केला तर इतिहास संशोधन व लेखन वस्तुनिष्ठपणे होण्याची शक्यता दुरापास्त होते.
युरोपमध्ये इतिहास संशोधन व लेखन सुरु झाले. युरोप खंडात ज्या घडामोडी घडल्या, नवनवीन विचारप्रवाह उदयास आले.त्यामुळे इतिहास विषयाच्या अभ्यासात नवनवीन विषयाची भर पडत केली.यामुळे राजा,राणी आणि त्यांच्या लढाया इथंपर्यंत मर्यादित असलेल्या इतिहासामध्ये मानवी जीवनाच्या राजकीय,सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक, घटनात्मक,प्रशासकीय, धार्मिक अशा विविध अंगाचा अभ्यास केला जाऊ लागला.आज तर पृथ्वीच्या पोटात दडून बसलेल्या मानवी जीवनाशी निगडीत विषयापासून अवकाशात झेपावणाऱ्या क्षेपणास्त्रापर्यंत,उपग्रहापर्यंतचा इतिहासामध्ये अभ्यास केला जात आहे. मानवी जीवन जसे जसे प्रगतिची विविध क्षेत्रे पादांक्रात करत जाईल तस तसे इतिहासाच्या अभ्यासात नवनवीन विषयाची भर पडत जाईल.
युरोप खंडातील या घडामोडीच्या आणि इतिहासाच्या दृष्टीने १८ वे शतक महत्वपूर्ण ठरले.१८ वे शतक हा युराेपमधील बुध्दिप्रामाण्यवादाचा काळ होता.या शतकातही इतिहासाचा साहित्याच्या क्षेत्रात अंतर्भाव केला जात होता. १८ व्या शतकात बुध्दिप्रामाण्यवादाच्या प्रभावामुळे प्रत्येक गोष्ट निखळ बुध्दीच्या निकषावर तपासून पाहण्याची वृत्ती शिगेला पोहोचली होती.यामुळे बुध्दिवादी विचारवंत इतिहासातील सत्याविषयी शंका व्यक्त करत होते. तसे आजही शंका व्यक्त करतात.१८ व्या शतकात होऊन गेलेला रॉबर्ट वॉलपोल इतिहास असत्यावर आधारलेला असल्यामुळे विश्वासार्ह नसतो असे आपल्या मुलाला म्हणाला होता.परंतु इंग्लंडचा पहिला पंतप्रधान म्हणून रॉबर्ट वॉलपोलची नोंद इतिहासाने घेतली आहे. संसदीय लोकशाहीच्या विकासातील रॉबर्ट वॉलपोलचे योगदानाची दखल इतिहासाने घेतली आहे.
१८ व्या शतकात इतिहासाबाबत जो नकारात्मक दृष्टिकोन उदयास आला होता. तो मात्र १९ व्या शतकात टिकला नाही.१९ व्या शतकात बुध्दिवादाविरुध्दची प्रतिक्रिया म्हणून इतिहासलेखनात कल्पनाशक्तीला स्थान मिळाले.साहित्या क्षेत्रात आलेल्या रोमांटिसिझमचा प्रभाव इतिहासलेखनावर झाला.त्याचबरोबर याच शतकात इतिहासाचे शास्त्रीय लेखन व्हावे असा आग्रह इतिहास तज्ञांनी धरला.याच शतकात इतिहासकाराने प्रत्येक विधान सत्याच्या निकषावर पारखून घ्यावे. तसेच प्रत्येक विधानाला विश्वासार्ह पुरावा देणे हे इतिहासकाराचे कर्तव्यच आहे असे मत आग्रहाने जर्मन इतिहास संशोधक लिओपोल्ड रँके यांनी मांडले.
१८ व्या व १९ व्या शतकात इतिहास संशोधन व लेखनाबाबत जी वैचारिक घुसळण झाली.त्यामुळे २० व्या शतकात इतिहास हे शास्त्रच आहे असे आग्रहाने प्रतिपादले जाऊ लागले. प्रा.जॉन बरी यांनी केंब्रिज विदयापीठातील पहिल्या भाषणात ‘इतिहास शास्त्रच आहे दुसरे कांही नाही’ (History is Science, No Less, no more )असा विचार मांडला. तर त्यापुढे जावून प्रा.जॉर्ज ओटो ट्रिव्हेलियन यांनी ‘इतिहास केवळ शास्त्र नसून कलाही आहे’असे ठाम मत मांडले. या सर्वांचा परिणाम म्हणून इतिहास संशोधन व लेखन शास्त्रीय पध्दतीने केले जाऊ लागले. इतिहास संशोधनात पुराव्याला अनन्यसाधारण महत्व आले. पुरावा नाही तर इतिहास नाही(No Document,No History) हे सेनेबॉस व लेजिलॉस यांचे मत प्रमाण मानून पुराव्याच्या आधारेच इतिहास लेखन केले जाऊ लागले.
मानव जातीचा इतिहास हे एक भव्य ज्ञानभांडारच आहे. आजचा वर्तमान हा उद्याचा इतिहास असतो.प्रत्येक काळातील समाजात गुण अवगुण वा चांगल्या व वाईट वृत्ती असतात.समाज अशा दोन्ही वृत्तीने बनलेला असतो.ब्रिटीश इतिहासलेखक गिबन याने ‘इतिहास म्हणजे मानवजातीने केलेले गंभीर गुन्हे, मूर्खपणा आणि दुर्दैव याच्या कथेशिवाय काही नाही’ हा मांडलेला दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. इतिहास संशोधनातून या दोन्ही वृत्तीचा अभ्यास केला जातो. इतिहास यापैकी कोणत्याही वृत्तीला नाकारत नाही.शिक्षणातून देशाचे भावी उत्तम नागरिक घडविण्यासाठी भूतकाळातील जे प्रेरणादायी,मार्गदर्शक,दिशादर्शक,अस्मिता जागृत ठेवणारे,स्वत्व जागवणारे,संस्कृती व देशाबाबत अभिमान निर्माण करणारे घटक म्हणजे उत्तम प्रशासक असलेले राजे, पराक्रमी राजे, कला,संस्कृती व साहित्य,उत्तम व अजरामर कलाकृती इत्यादी इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमातून शिकवले जाते. जसे आपल्या कुटुंबात समाजातील जे चांगलं आहे तेच आपल्या मुलांसमोर ठेवतो.त्याचप्रमाणे इतिहास विषयाच्या शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रमाबाबत केले जाते.
महान तत्वचिंतक बर्ट्रंड रसेल यांनी इतिहासाच्या अध्ययानाबाबत जे मत मांडले आहे. ते खूप लक्षणीय ठरते. ते म्हणतात की, ‘इतिहासाच्या अभ्यासामुळे माणसात विवेकी समतोल, सम्यकदृष्टी निर्माण होते. मानवी जीवनातील चांगल्या वाईट, इष्ट- अनिष्ट गोष्टी कळल्यामुळे बुध्दी प्रगल्भ होते. मनोवृत्ती स्थिर होतात. मानवी व्यवहाराचे अर्थ अधिक स्पष्टपणे कळतात. त्याचबरोबर माणसांच्या विचारांना व भावनांना स्थैर्य आणि सखोलता प्राप्त होते.’ यास्तव इतिहासाचा अभ्यास करणे आपल्या पूर्वजांचा भूतकाळ जिज्ञासूवृत्तीने जाणून घेणे आवश्यक ठरते.........